आषाढी वारीसाठी खान्देशातील वारकऱ्यांना दिलासा; उधना–मिरज विशेष रेल्वेची सुविधा, ४ जुलैपासून आरक्षण सुरू -खासदार स्मिता वाघ.
आबिद शेख/अमळनेर

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील हजारो वारकरी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्याबाबत खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांनंतर ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उधना–मिरज विशेष (क्र. 09071) ही गाडी 23 आणि 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटेल. तर मिरज–उधना विशेष (क्र. 09072) ही गाडी 24 आणि 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता उधनाकडे रवाना होईल.
या विशेष रेल्वेच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण 4 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून, वारकरी आणि प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
