अमळनेरच्या इस्लामपुरा भागात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा आरोप.

Oplus_131072
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरातील वार्ड क्रमांक 14 मधील इस्लामपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नळांमधून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून त्यामध्ये माती व इतर अशुद्ध घटक मिसळलेले दिसत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विविध जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इस्लामपुरा भागातील रहिवाशांनी नगरपालिकेने तात्काळ पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून दूषित पाणीपुरवठा थांबवावा तसेच स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, पाईपलाईनमध्ये गळती किंवा सांडपाणी मिसळत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असावी. त्यामुळे नगरपालिकेने त्वरित दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून नगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
