पोलीस सेवेत रुजू झाल्यावर समाजाची उत्तम सेवा करा; आयपीएस वैभव गायकवाड यांचे आवाहन.

0
New Doc 06-02-2026 09.20

आबिद शेख /अमळनेर

अमळनेर : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे आणि श्रमसाफल्य अभ्यासिका वेल्हाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हैदराबादचे पोलीस अधीक्षक आयपीएस वैभव गायकवाड, नाशिक आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त कपिल पवार, अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण शिंदे, अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, श्रमसाफल्य अभ्यासिकेचे संचालक के. एल. पाटील, ॲड. रामकृष्ण उपासनी, रवींद्र कुंभार, राहुल पाटील व प्रा. अवीत पाटील उपस्थित होते.

 


यावेळी मार्गदर्शन करताना आयपीएस वैभव गायकवाड म्हणाले की, “जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर तुम्ही पोलीस भरतीत यश मिळवले आहे. आता पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने सेवा करा.” त्यांनी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत टेस्ट सिरीजचे कौतुक करताना या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाल्याचे सांगितले. भविष्यात येथून अनेक उच्चपदस्थ अधिकारी घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


यावेळी सहआयुक्त कपिल पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, के. एल. पाटील, प्रकाश वाघ, राहुल पाटील आणि अध्यक्ष आत्माराम चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी उमेदवारांमधून शितल पाटील, हर्षल पाटील आणि रचना पाटील यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धा परीक्षा केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला निशुल्क सेवा देणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा विशेष स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस व संरक्षण सेवेत निवड झालेल्या उमेदवारांचा गौरव करण्यात आला.
कल्पेश संजय पाटील (ठाणे शहर पोलीस), गीतांजली नितीन पाटील (मीरा-भाईंदर पोलीस व मुंबई शहर कारागृह पोलीस), शितल युवराज पाटील (मुंबई शहर पोलीस), हेमंत रामकृष्ण काटे (धुळे एसआरपीएफ), हर्षल रवींद्र पाटील (मुंबई शहर पोलीस), अजय ईश्वर राजपूत (मुंबई शहर पोलीस), जगदीश राजाराम पाटील (एसआरपीएफ वरणगाव), अनिल जिजाबराव पाटील (मुंबई शहर पोलीस), योगेश प्रदीप पाटील (पालघर पोलीस), शशिकेश दीपक पाटील (सीआरपीएफ), गायत्री बारकू पाटील (ठाणे शहर पोलीस), रचना राजेंद्र पाटील (पालघर पोलीस) आणि श्याम शांताराम पाटील (एअर फोर्स).
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुषा इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स अमळनेरचे संचालक निलेश वाघ व हर्षदा वाघ यांनी स्मृतिचिन्हांचे प्रायोजन केले. नगरसेवक राजूदादा फाफोरेकर, तलाठी एम. आर. पाटील, गोकुळ बोरसे, जयेश मालपुरे, दिनेश मनोरे आणि नरेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयसिंग पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed