अमळनेरमध्ये जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी; संत सखाराम महाराज नगरजवळ व्हालमधून हजारो लिटर पाणी वाया..
अमळनेर /आबिद शेख
शहरात एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत असताना दुसरीकडे संत सखाराम महाराज नगर परिसरात व्हाल (पाणीपुरवठा वाल्व) मधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या व्हालमधून सतत पाणी गळती होत असल्याचे दिसून आले. अनेक दिवसांपासून ही गळती सुरू असूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहून जात असून जलसंपत्तीचा अपव्यय होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या गळतीमुळे परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच डासांची वाढ होण्याची शक्यता असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही भागात पाणीपुरवठा अपुरा असताना अशा प्रकारे पाणी वाया जाणे ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन गळती थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करावी, तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करून गळती रोखण्याचे उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
