प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ अनिवार्य; शालेय बस नियम अधिक कडक..
24 प्राईम न्यूज 12 April 2026
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी शासनाने शालेय बस वाहतुकीसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ स्थापन करणे अनिवार्य करण्यात येणार असून, शालेय बस सेवांवर या समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार आहे.

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (पहिली सुधारणा) नियम, २०२६’ या मसुद्याची घोषणा केली असून, त्यावर पुढील १५ दिवसांत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देताना राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

भाडे नियंत्रणासाठी आरटीएची भूमिका
नवीन प्रस्तावानुसार, शालेय बसचे भाडे आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) द्वारे निश्चित व नियंत्रित केले जाणार आहे. यामुळे पालकांवर होणारा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे.
आगाऊ फीला पूर्णविराम

शालेय बस चालक किंवा व्यवस्थापनाकडून वर्षभराचे भाडे एकरकमी आगाऊ घेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. यापुढे फक्त मासिक शुल्क आकारणे बंधनकारक असेल.
सुरक्षा उपाय अधिक मजबूत
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटण बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये महिला कर्मचारी असणे आवश्यक राहणार आहे.
कर्मचाऱ्यांची पडताळणी बंधनकारक
बस चालक व इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी अनिवार्य करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तक्रार निवारणासाठी समिती
प्रत्येक शाळेत स्थापन होणारी परिवहन समिती ही भाडे, सुरक्षा व सेवा यासंदर्भातील तक्रारींचे निवारण करेल. या समितीला दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.
एकूणच, नव्या नियमांमुळे शालेय बस व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता येणार असल्याचे चित्र आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139000
18 Ct सोने 75.00% : ₹. 115000
शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
