अतिवृष्टीग्रस्त भागांची काँग्रेस सेवादलतर्फे आज पाहणी; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागात शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीपिकांचे नुकसान, घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादलच्या वतीने आज, रविवार (दि. २ ऑगस्ट २०२६) रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाजवळ सर्व पदाधिकारी, माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तेथून सर्वजण एकत्रितपणे विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

पाहणीनंतर झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना योग्य नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी सोमवारी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे आवाहन काँग्रेस सेवादलचे अमळनेर तालुकाध्यक्ष बन्सीलाल आसाराम भागवत आणि शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील यांनी केले आहे.
