अमळनेरात घरफोडी; पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या घरातून ६४ हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर /आबिद शेख
शहरातील ढेकू रोडवरील जययोगेश्वर कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

वैशाली चंद्रकांत वाघ या १४ मार्चपासून मुलाकडे पुणे येथे गेल्या होत्या. दरम्यान ४ एप्रिल रोजी त्यांच्या मुलाच्या मित्राने घराचा कडी-कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसून आले.
५ एप्रिल रोजी वैशाली वाघ अमळनेर येथे परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता कपाटाचे कुलूप तोडलेले असून घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी कपाटातील सुमारे ३० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे सुमारे ३० भार चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील तांबे, पितळ व कास्याची भांडीही लंपास करण्यात आली आहेत.
या प्रकरणी वैशाली वाघ यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार संशयित चोरट्यांची हालचाल कैद झाली असून, त्यापैकी एक जण बाहेर पहारा देत असताना इतरांनी घरातील साहित्य पिशव्यांमध्ये भरून नेल्याचे समोर आले आहे.
