पाईपलाईन कामाचा खेळखंडोबा; ३० दिवसांपासून नागरिकांचे हाल, प्रशासन बेफिकीर!
आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन कामामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या २५ ते ३० दिवसांपासून सुरू असलेले हे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेकडून या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही, तसेच कामाचे नियोजनही ढिसाळ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या संथ आणि निष्काळजी कामकाजामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून काम जलद गतीने पूर्ण करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
