अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा; रुग्णांना विनाकारण धुळे येथे रेफर केल्याचा आरोप..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी नगरसेवक नविद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना खरमरीत निवेदन दिले आहे. रुग्णांना विनाकारण धुळे येथे ‘रेफर’ करण्याच्या प्रकारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

प्रमुख तक्रारी आणि समस्या
नविद शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याऐवजी त्यांना थेट धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे विशेषतः गरिब रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही तातडीने धुळे येथे पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. प्रवासातील विलंबामुळे माता व बालकाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतानाही केवळ जबाबदारी

टाळण्यासाठी रुग्णांना इतरत्र पाठवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांचीच – नविद शेख
“रुग्णालयात सोयीसुविधा असतानाही रुग्णांना बाहेर पाठवणे हा वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणा आहे. यापुढे उपचारात हलगर्जीपणा झाल्यास आणि कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास सर्वस्वी वैद्यकीय अधीक्षक जबाबदार राहतील,” असे नविद शेख यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
तात्काळ कारवाईची मागणी
संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक ताकीद देण्यात यावी आणि रुग्णांवर अमळनेरमध्येच योग्य उपचार होतील याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
