इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी; भाजप युवा मोर्चाचे नगरपरिषदेला निवेदन..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकावरून वाद निर्माण झाला असून तो तात्काळ हटवावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा अमळनेरच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल मगन चौधरी यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इस्लामपुरा परिसरात लावण्यात आलेला फलक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही फलक किंवा नामफलक लावताना संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र सदर फलक नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
तसेच, अशा प्रकारच्या वादग्रस्त फलकांमुळे शहरातील काही समाजघटकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे सामाजिक सलोखा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अमळनेर शहरात सर्व समाजामध्ये शांतता, सलोखा आणि परस्पर आदर कायम राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान यांचा फलक तात्काळ काढण्यात यावा तसेच भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त फलक परवानगीशिवाय लावले जाणार नाहीत यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी दीपक भोई, दीपक पवार, समाधान पाटील, शिवकिरण बोरसे, कल्पेश पाटील, सौरभ पाटील, बजरंग दलाचे नितेश कामदार, सुमित राजपूत, नलेश पाटील, मनोज महाजन, अमोल महाजन, हितेश माळी, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, परेश जोशी, कुणाल शाह, गौरव विसपुते, प्रसाद भामरे, सागर शेटे, हर्षल शिंपी, राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे उपस्थित होते.
