कत्तलीसाठी गोऱ्ह्याची बेकायदेशीर वाहतूक; तिघांना अटक, न्यायालयीन कोठडी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : कत्तलीसाठी गोऱ्हा नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो-रक्षकांनी रंगेहात पकडून दिल्याने शहरातील ताडेपुरा येथील एक आणि तालुक्यातील वासरे येथील दोन अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१४ मार्च रोजी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अविनाश भदाणे हे शाहआलम नगर परिसरातील आयटीआय कॉलेजजवळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गो-रक्षक सचिन महाजन व पवन बारी यांनी त्यांना माहिती दिली की, वाहन क्रमांक एमएच-५४-ओ-१२२ या वाहनातून एक गोऱ्हा कत्तलीसाठी नेला जात आहे.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनाची तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान चालक बंटी उर्फ विजय कैलास धनगर (वय २२, रा. ताडेपुरा) हा कोणतीही परवानगी व वैद्यकीय तपासणी न करता गोऱ्ह्याची वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
तपासात गोऱ्ह्याचे मालक नामदेव परमेश्वर पाटील (वय ३५) व शरद रतीलाल पाटील (वय २५, दोघे रा. वासरे) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पैशाची गरज असल्यामुळे हा गोऱ्हा मोईन नावाच्या व्यक्तीला विकण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
