गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ शनिवार (दि.14 मार्च) रोजी अमळनेर तालुक्यातील गडखांब, मंडळ नगाव येथे उत्साहात पार पडले.


त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
या शिबिराचे उद्घाटन अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. पुरवठा शाखेमार्फत 137 नवीन व दुबार शिधापत्रिका, संगायो शाखेमार्फत 99 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 235 हयात प्रमाणपत्रे तसेच 42 नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले.
महसूल विभागामार्फत 31 सातबारा दुरुस्ती, 22 फेरफार नोंदी, 720 सातबारा उतारे वाटप तसेच 410 उतारे वितरण करण्यात आले. सेतू शाखेमार्फत 318 उत्पन्न दाखले, 135 रहिवासी दाखले, 49 जातीचे दाखले आणि 13 नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रे नागरिकांना देण्यात आली.
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल व प्रदर्शनीय टेबल लावण्यात आले होते. या शिबिरास सुमारे 800 ते 850 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली असून, शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रस्तावना मांडली, तर निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
