दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपयांचे अनुदान सुरू होणार; 20 मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे तहसीलदारांचे आवाहन…
अमळनेर : आबिद शेख
तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून यासाठी आवश्यक कागदपत्रे 20 मार्चपर्यंत जमा करण्याचे आवाहन अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तालुक्यातील तलाठ्यांकडे असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या यादीनुसार पात्र व्यक्तींना दरमहा 2500 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सध्या संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करावीत, असे त्यांनी सांगितले.

यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र, यूडीआयडी (UDID) कार्ड, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात 20 मार्चपर्यंत जमा करावी. तसेच लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी प्रमाणपत्र आधार कार्डशी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन सलग्न करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात तहसीलदार सुराणा यांनी पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका ग्राम महसूल अधिकारी यांना लेखी सूचना देऊन नोटीस बोर्डावर माहिती प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवून त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करावीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

