“नळ कापणाऱ्यांची पुढच्या निवडणुकीत ‘राजकीय लाईन’ कापू!” — अमळनेरकरांचा इशारा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतांसाठी घराघरात जाऊन हात जोडणारेच लोक सत्तेत आल्यानंतर नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करत असतील, तर अमळनेरकर त्यांना पुढील निवडणुकीत धडा शिकवतील, असा तीव्र इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.

शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या वेळी विविध आश्वासने देत जनतेचा विश्वास संपादन करणारे लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना काही नागरिकांनी संताप व्यक्त केला. “अमळनेर नपा निवडणुकीत मतांसाठी हात जोडणारेच आता सत्तेत बसून जनतेचा नळ कापत असतील, तर अमळनेरकर पुढच्या निवडणुकीत त्यांची ‘राजकीय लाईन’च कापायला मागे-पुढे पाहणार नाहीत,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांच्या या नाराजीमुळे आगामी काळात अमळनेरच्या राजकारणात या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

