“एकच वादा अजितदादा…” – अजितदादांच्या निधनाने विकासपुरुष हरपला : कृषिभूषण साहेबरावदादा पाटील
अमळनेर | आबिद शेख
“मी आमदार झाल्यानंतर माझे ‘एकच वादा अजितदादा’ हेच ब्रीद होते. विकासकामांच्या बाबतीत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. पाडळसरे धरणाला भरीव निधी देवून अमळनेर तालुक्याला खरीखुरी व शाश्वत उंची देण्याचे काम अजितदादांनी केले,” अशा भावनिक शब्दांत माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
ते पुढे म्हणाले की, “पाणी प्रश्न सोडविणारा पाणीदार नेता म्हणून अजितदादा ओळखले जात होते. पाणी देऊन, पाणी अडवून त्यांनी आपला वादा पूर्ण करून दाखवला. अमळनेर शहरासाठी बोरी नदीवरील पूल, प्रशस्त रस्ते यांसह विविध विकासकामांना त्यांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिले. माझ्या मागे विकासकामांसाठी ते सातत्याने पाठीशी उभे राहिले.”
“अजितदादा गेले यावर अजूनही विश्वास बसत नाही. दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. स्वभावाने कधी कडक तर कधी मायेने समजावणारा तो हात आज कायमचा हरपला आहे. क्षणभर असे वाटते की, राज्याचा विकासच थांबला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अमळनेर आणि अजितदादा यांचे नाते हे केवळ राजकीय नव्हते, तर विकासाचे होते. “एकच वादा, अजितदादा… अजितदादा अमर रहे, अमर रहे!” अशा घोषणेसह कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
