क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे उपविभागीय कार्यालयावर ‘बोंबा बोंब’ निवेदन; विविध शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याची मागणी..
अमळनेर |आबिद शेख
क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रविकांत तुपकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. शरद विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज ‘बोंबा बोंब’ निवेदन सादर करण्यात आले. या

संपर्क :- 7074742121
निवेदनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे शासकीय अनुदान अद्याप पूर्णपणे मिळालेले नाही. तसेच विधवा, परितक्ता, ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी सुरु असलेल्या संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी योजनेतील अनेक लाभार्थ्यांना DBT प्रणालीच्या नावाखाली लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हजारो गरजू लाभार्थ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
शेतकऱ्यांना झालेल्या पिक नुकसानीबाबत शासनाकडून पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीचे अनुदान का दिले जात नाही, असा सवालही संघटनेने उपस्थित केला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून सुरु करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, गोठा शेड, शोष खड्डे व घरकुल अशा कामांसाठी कुशल व अकुशल मजुरीचे अनुदान वेळेत न मिळाल्याची तक्रारही करण्यात आली. अमळनेर उपविभागातील शेकडो लाभार्थ्यांना या निधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सदर सर्व लाभार्थी हे शेतमजूर व गरीब कष्टकरी वर्गातील असून लाभ न मिळाल्याने त्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्रलंबित अनुदान व योजनांचा लाभ तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
