९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकार शरद धनगर यांची निवड..

आबिद शेख/ अमळनेर
दिनांक १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी व गझलकार शरद धनगर यांची निवड झाली आहे. या संमेलनातील गझल कट्टा मंचावर खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष असलेले कवी गझलकार शरद धनगर यांना गझल सादरीकरणासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
संमेलनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तरन्नूम विशेष मुशायऱ्यात शरद धनगर आपल्या गझलांचे सादरीकरण करणार आहेत. हा मुशायरा दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
शरद धनगर हे एक नामवंत कवी–गझलकार असून ते खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध साहित्य संमेलने, मुशायरे व काव्य संमेलनांमध्ये त्यांना सातत्याने निमंत्रित केले जाते.
याशिवाय साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्योत्सव’ या राष्ट्रीय साहित्य महोत्सवात त्यांना अहिराणी कविता सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले होते, ही त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील उल्लेखनीय बाब मानली जाते.
त्यांच्या या निवडीबद्दल खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्यासह संघाचे पदाधिकारी व विविध मान्यवरांनी शरद धनगर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
