खा.शि. मंडळ निवडणूक: आशिर्वाद पॅनलने प्रचाराला जोर, उमेदवारांची ताकद ठळक.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : खा.शि. मंडळाच्या येऊ घातलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असून, दि. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्जांची विक्री सुरू राहणार आहे. त्यानंतर दि. १३ ते १६ डिसेंबरदरम्यान चार दिवस उमेदवारी अर्ज भरण्याची अधिकृत मुदत दिली असून, निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

दरम्यान, आशिर्वाद पॅनलने प्रचारात सर्वप्रथम मुसंडी मारत निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. शनिवारी सकाळी वाडी चौकात आ. अनिल दादा यांच्या हस्ते पॅनलच्या प्रचाराचे शुभारंभ नारळ फोडून करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात कोणतीही भाषणे न करता अत्यंत साधेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. आ. अनिल दादांनी पॅनलला मनःपूर्वक शुभेच्छा देत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
या वेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पॅनलच्या बळात भर घालणारी होती. नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, जितेंद्र ऊर्फ छोटू जैन, योगेश मुंदडा, कल्याण बापू, डॉ. अनिल शिंदे आणि हरी भिका वाणी हे आठ उमेदवार या निवडणुकीसाठी पक्के उमेदवार आहेत. यापैकी सात उमेदवार हे विद्यमान संचालक असून एक माजी संचालक आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे, विद्यमान संचालक विनोद भैय्या यांनी प्रत्यक्ष उमेदवारी न करता मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ आशिर्वाद पॅनलला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे मानले जाते.
आगामी दिवसांत अर्ज भरणी सुरू होताच निवडणूक वातावरण आणखी तापेल, तर आशिर्वाद पॅनलच्या या दमदार सुरुवातीमुळे स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
