“नगराध्यक्षपदासाठी डॉ. बाविस्कर? – अनुभव, प्रशासन क्षमता आणि जनसंपर्कावर प्रश्नचिन्ह”
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परिक्षीत श्रीरामजी बाविस्कर यांचे नाव समोर आले असले तरी त्यांच्या उमेदवारीबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत. वैद्यकीय व्यवसायातून थेट राजकारणात प्रवेश करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर काही नागरिक व प्रतिस्पर्धी गटांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डॉ. बाविस्कर यांनी अल्पावधीत सेवा दिली असली तरी शहरासारख्या मोठ्या प्रशासनाच्या कारभाराचा अनुभव त्यांच्या हाताशी नाही, अशी टीका केली जात आहे. नगरपरिषदेसमोरील विविध तांत्रिक, आर्थिक व नागरी प्रश्न हाताळण्यासाठी फक्त वैद्यकीय पार्श्वभूमी पुरेशी ठरेल का, हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
अमळनेरच्या पारंपरिक सामाजिक, राजकीय रचनेची सखोल समज नसताना थेट नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेणे योग्य आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. विकासाचे आश्वासन मोठे असले तरी त्याची अमलबजावणी करण्यासाठी मजबूत टीम, व्यापक अनुभव आणि जनतेचा सततचा संपर्क आवश्यक असल्याचे अनेकांचे मत आहे.
काही नागरीकांनी असेही मत व्यक्त केले की,
“शहराचे प्रश्न रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, निधीवाटप यांसारखे बहुआयामी आहेत. डॉक्टर असणे ही सेवा आहे, पण प्रशासन म्हणजे पूर्णपणे वेगळी जबाबदारी.”
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत डॉ. बाविस्कर यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्या कार्यक्षमतेबाबतचे प्रश्न आणि शहराच्या जटिल प्रशासकीय कामकाजाची जाण याविषयी साशंकता कायम आहे. आगामी काळात त्यांच्याविरुद्ध मांडलेल्या या मुद्द्यांना ते कशी उत्तरं देतात, याकडे अमळनेरकरांचे लक्ष आहे.
