प्रेमविवाहासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्याची मागणी — ‘भारत जागृत मंच’कडून राज्य सरकारकडे अतितातडीचे निवेदन..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :महाराष्ट्रात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे समाजात निर्माण होणारे तणाव आणि कुटुंबीयांतील मतभेद रोखण्यासाठी ‘भारत जागृत मंच’ या संस्थेने राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी पालकांची लेखी संमती अनिवार्य करणारा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आज अमळनेर येथे संस्थेच्यावतीने मंत्री मा. गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन आणि नवप्रवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात संस्थेने म्हटले आहे की, अल्पवयीन आणि प्रौढ युवक-युवतींमध्ये प्रेमसंबंधांमुळे देशभरात गंभीर गुन्हे, फसवणुकीच्या घटना आणि कौटुंबिक आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांमुळे पालकांचा मानसिक ताण वाढत असून समाजातील संतुलन बिघडत आहे.

विवाह नोंदणीसाठी पालकांची लेखी संमती अनिवार्य करावी पालकांच्या संमती शिवाय विवाह करणाऱ्यांना संपत्ती व कुटुंब नोंदीतून वगळण्याचा अधिकार पालकांना द्यावा प्रेमविवाह संस्था, मंदिर व विवाह नोंदणी केंद्रांवर नियंत्रण ठेवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत तपासणी करावी.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, “आई-वडिलांच्या विरोधात जाऊन विवाह करणाऱ्या युवक-युवतींमुळे पालकांचा अपमान होत असून, हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रेमविवाहासाठी पालकांची संमती घेणे अत्यावश्यक आहे.”
‘भारत जागृत मंच’ने राज्य शासनाला २१ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याची मागणी केली असून, हा मुद्दा लोकसभा आणि विधानसभेत विधेयकाद्वारे मांडावा, अशीही विनंती केली आहे.
संस्थेचा विश्वास आहे की या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास पालकांचा सन्मान, सामाजिक शिस्त आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण साध्य होईल.
