अमळनेरात शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जोशपूर्ण भाषण; मुस्लिम बांधवांचा पक्षात प्रवेश.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे शिवसेनेतर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी जोशपूर्ण भाषण करत कार्यकर्त्यांना नवचैतन्य दिले. यावेळी काही मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षावर विश्वास दाखविला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखाताई, संजय पाटील (भूत बापू), सुरेश पाटील, प्रवीण पाटील, तसेच रियाज मौलाना आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले,
“शिवसेनेसोबत माझा प्रवास प्रमोद महाजन यांच्या सभेपासून सुरू झाला. तेव्हापासून मी एक विचार, एक झेंडा आणि एकच नेता वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वावर चालत आलो आहे.”
ते पुढे म्हणाले,
“शिवसेना ही फक्त पक्ष नाही, ती एक संघटना आहे — कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभी असलेली ही खरी शक्ती आहे.”
राज्याच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत पाटील म्हणाले,
“चार तास झोपून २० तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. राज्याच्या विकासासाठी ते झटत आहेत.”

