अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्री व मंत्रींकडे तातडीच्या मदतीची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर — अमळनेर विधानसभा मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना. मकरंद पाटील यांना निवेदन देत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे.

आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यानंतर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले. त्यातच आता झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घासही गेला आहे.

अमळनेर मतदारसंघातील ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी तब्बल ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी व २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
सध्याच्या शासन निकषांनुसार फक्त उभ्या पिकांचा पंचनामा केला जातो; मात्र अवकाळी पावसामुळे कापणी झालेली पण शेतात पडलेली पिकेही पूर्णतः नष्ट झाली आहेत. त्यामुळे या पिकांचाही विशेष बाब म्हणून पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी आमदार पाटील यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
“शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. शासनाने तात्काळ मदतीचे आदेश द्यावेत,”. — आमदार अनिल पाटील.

