अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे व भरपाईची मागण..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील नगाव खूर्द, नगाव बुद्रुक, गढखांब तसेच पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांबरोबरच काढणीस आलेले कापूस, मका, उडीद, मुग, आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याच्या अवस्थेत आहेत.

शेतकऱ्यांचे या नुकसानीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेकांचे महिन्यांचे परिश्रम पाण्यात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत आणि भरपाई देण्याची मागणी केली आहे.

स्थानिक शेतकरी म्हणाले की, “आम्ही आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत होतो. आता अवकाळी पावसामुळे उभे पिकच गेले. शासनाने तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा.”
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असून, प्रत्यक्ष पंचनामे लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

