थाटामाटात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न — ११ जोडप्यांचे निकाह, सामाजिक ऐक्याचा अनोखा नमुना..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — अमळनेर शहरात सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर रोजी ११ जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. मध्य प्रदेशातील प्रख्यात मार्गदर्शक मुफ्ती इम्रान यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यास हजारो बांधव आणि पाहुण्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केबिनेट मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. त्यांनी हिंदी भाषेत मनोगत व्यक्त करताना सामुहिक विवाहासारख्या उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य आणि सद्भावना वृद्धिंगत होतात, असे सांगितले. वधू-वरांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमासाठी मंचावर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जितू ठाकूर, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, मनोज पाटील, नरेंद्र चौधरी, रणजित शिंदे, सत्तार मिस्त्री, आरीफ खान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
इस्लामी सुन्नती पद्धतीनुसार विवाह सोहळे पार पडावेत यासाठी फयाज शेख व अझहर नूरी यांनी धार्मिक मार्गदर्शन करत निकाह अदा केले. संस्थेच्या वतीने सर्व ११ वधूंना संसारोपयोगी साहित्य — लाकडी कपाट, पलग, कुरआन शरीफ, जानमाज, भांडी संच, घडी व आवश्यक गृहसाहित्य भेट देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी, जुबेर पठाण, सचिव अझहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन आणि सदस्य हाजी शब्बीर पहलवान, जाकिर शेख, मट्या खाटीक, इम्रान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. रज्जाक शेख यांनी शेरोशायरीच्या अंदाजात प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन सैय्यद अजहर अली यांनी मानले. सामाजिक एकता आणि सेवाभाव जपणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्याचे शहरभरातून कौतुक होत आहे.

