अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांचा अपमान — व्यापाऱ्यांकडून फेकाफेक व नीलामीत कपट..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथे शेतकऱ्यांशी अमानवी वागणूक होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. नीलामीदरम्यान काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा माल खाली फेकणे, हसणे-टिंगल करणे आणि योग्य दर न देणे अशी प्रकारे खुलेआम सुरू आहेत.
शेतकऱ्यांनी सांगितले की, “आम्ही दिवसभर कष्ट करून माल तयार करतो आणि विक्रीसाठी बाजारात आणतो. मात्र व्यापारी तो माल हातात घेतात, खाली फेकतात आणि पुढे जातात. अशा प्रकारे आमचा अपमान केला जातो.”


शेतकऱ्यांचा आरोप: “मालाची किंमत नाही, फक्त हिणवणूक होते” स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, बाजारात ना पाण्याची नीट सोय आहे, ना व्यापाऱ्यांकडून शिष्टाचार. यामुळे शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. नीलामीत कोणत्याही मालाला योग्य दर मिळत नाही. “माल परत नेला तर नुकसान वाढते, त्यामुळे व्यापारी जसा दर सांगतो तसाच माल विकावा लागतो,” असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हक्काचा बाजार व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे धोक्यात आला असून, प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


