गांधीनगर अतिक्रमण प्रकरणात अपील फेटाळले; वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – गांधीनगर अतिक्रमण प्रकरणात जैसे थे आदेश मिळण्यासाठी करण्यात आलेले अपील न्यायालयाने फेटाळले आहे. न्या. लक्ष्मण गायकवाड यांनी हा निर्णय देत अपील डिसमिस केले असून, त्यामुळे आता रस्त्याचे रुंदीकरण आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या प्रकरणात ॲड. सलीम खान यांनी ३६ अतिक्रमणधारकांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र न्यायालयाने नगरपरिषदेच्या बाजूने निर्णय देत अपील फेटाळले. नगरपरिषदेच्या वतीने ॲड. किरण पाटील यांनी युक्तिवाद केला.
या निर्णयानंतर नगरपरिषदेकडून अतिक्रमणाचा मलबा, घरांचा राडा आणि निरुपयोगी साहित्य हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गांधीनगर रस्त्यातील दगड, विटा आणि माती हटवण्यात आली असून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात येत आहे.
पालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना म्हाडा कॉलनीत घरे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने नागरिकांसाठी वाहतुकीचा मार्ग आता सुकर व सुरक्षित होणार आहे.

![]()
