१३ ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार!महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा.
24 प्राईम न्यूज 10 Aug 2026

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आगामी काही दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ऑगस्टच्या उत्तरार्धात राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना पावसाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ८ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण तसेच दक्षिण कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
९ ते १२ ऑगस्टदरम्यान कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार असून, त्यानंतर १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

