वृक्ष लागवडीसोबत संवर्धनाचीही गरज; जनजागृतीचा संकल्प करूया – आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : शासनाच्या विविध वृक्षारोपण योजनांअंतर्गत दरवर्षी शासकीय यंत्रणा, विविध संस्था, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. मात्र केवळ झाडे लावून छायाचित्रे काढण्यापलीकडे जाऊन त्यांच्या संवर्धनाकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केले.

ते म्हणाले की, लावलेल्या रोपांना नियमित पाणी मिळते का, जनावरांपासून त्यांचे संरक्षण केले जाते का, तसेच त्यांचे योग्य संगोपन होते का, याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. केवळ वृक्षारोपणाचा आकडा वाढविण्यापेक्षा ती झाडे जगविणे अधिक महत्त्वाचे आहे.
दरवर्षी कोट्यवधी वृक्षांची लागवड होत असली तरी त्यांच्या योग्य देखभालीअभावी वनाच्छादित क्षेत्रात अपेक्षित वाढ होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी “चला, वृक्ष लागवडीसोबत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचाही संकल्प करूया,” असा संदेश देत समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले.
