वाघोदे गावची कन्या चैताली पाटीलची मुंबई पोलीस दलात निवड; ग्रामस्थांकडून भव्य मिरवणुकीत स्वागत..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील चैताली रामकृष्ण पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतेच तिने नागपूर येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून चैताली गावी परतल्यानंतर वाघोदे ग्रामस्थांनी तिचे जोरदार स्वागत करत गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली.

चैतालीचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर चैतालीने पोलीस पदापर्यंत मजल मारत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपूर्वीच तिचा मोठा भाऊ पवन याची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून तो सध्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत आहे. आता बहीण चैताली देखील भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

कुटुंबात कोणीही मोठ्या पदावर नसताना, तसेच आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असतानाही केवळ अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर चैताली आणि तिच्या भावाने आजच्या तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मुलीही कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हे चैतालीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
चैतालीने वाघोदे गावाचे नाव उज्ज्वल केल्याने भाजपाचे जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, दामू अण्णा पाटील, राहुल पाटील, हितेश पाटील व मयूर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तिची मिरवणूक काढत सत्कार केला. यावेळी चैतालीच्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आला तसेच चैतालीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
