केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकरी प्रश्नांचा विसर? अमळनेरात स्वयंघोषित नेत्यांवर शेतकऱ्यांचा रोष…
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : केंद्राचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अलीकडील अमळनेर दौऱ्यादरम्यान तालुक्यातील शेतकरी प्रश्नांना प्राधान्य न मिळाल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, नेहमी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनावर आक्रमक भूमिका घेणारे काही स्वयंघोषित शेतकरी नेते या महत्त्वाच्या दौऱ्यात मात्र पूर्णपणे शांत दिसून आले.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या पिकांचे नुकसान, मजूर टंचाई, वाढते उत्पादन खर्च, सिंचनाची कमतरता आणि पीकविमा यांसारख्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र केंद्रीय कृषिमंत्री प्रत्यक्ष अमळनेरात आले असताना या प्रश्नांबाबत साधे निवेदनही देण्यात आले नाही, याबाबत शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक पातळीवर लहान-सहान मुद्द्यांवर आंदोलनाची भूमिका घेणारे काही नेते या वेळी मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आले नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. “जेव्हा थेट केंद्राच्या कृषिमंत्र्यांसमोर आपले प्रश्न मांडण्याची संधी होती, तेव्हा कोणीच पुढाकार घेतला नाही. मग शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करण्याचा अर्थ काय?” असा सवालही शेतकरी करत आहेत.
जळगाव जिल्हा तसेच अमळनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत पुढील काळात शेतकरी प्रश्नांवर खरोखर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने हा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची चर्चा आता अमळनेर परिसरात रंगू लागली आहे.

