हिंगोणे खु. ग्रामपंचायत झाली 100% थकबाकीमुक्त. सरपंच राजश्री पाटील यांची पुढाकारातून स्वखर्चाने भरला गावाचा कर; त्यातूनच थकीत वीज बिलही जमा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – तालुक्यातील हिंगोणे खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून शंभर टक्के

थकबाकीमुक्त झाली आहे. विशेष म्हणजे सरपंच राजश्री पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण गावाची घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला आर्थिक सक्षमतेकडे नेले.
ग्रामपंचायतीकडे लाईट बिलाची मोठी थकबाकी होती. मात्र, सरपंच पाटील यांनी स्वखर्चातून सुमारे ९ लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीत निधी उपलब्ध झाला. याच निधीतून ग्रामपंचायतीने थकीत असलेले ७ लाख ८० हजार रुपयांचे वीज बिल महावितरणकडे जमा केले.
या थकीत बिलाचा धनादेश महावितरणच्या अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून ते स्वतः या वेळी उपस्थित होते.
विकासकामांनाही गती
सरपंच राजश्री पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावात अनेक विकासकामे राबविण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने –
गाव दरवाजा उभारणी
नवीन स्मशानभूमी बांधकाम
ग्रामपंचायत कार्यालय विकास
पाणी पुरवठा योजना
संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण
आधुनिक व डिजिटल अंगणवाडी
शनिदेव मंदिर बांधकाम
महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
या कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.
