स्पर्धात्मक युगात यशासाठी पुस्तकांशी मैत्री आवश्यक. – प्रा. सुनील गरुड. अमळनेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन; टीईटीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..
अमळनेर /आबिद शेख
सध्याचा काळ हा पूर्णतः स्पर्धात्मक युगाचा असून येणाऱ्या काळात सर्वच शासकीय व निमशासकीय नोकरी भरती प्रक्रिया स्पर्धा परीक्षांच्या

माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचनाची सवय लावून घेत जागतिक व राष्ट्रीय घडामोडींचे अद्ययावत ज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. केवळ पैशाच्या जोरावर नोकरी मिळवण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने प्रामाणिक कष्ट करून यश मिळवावे, असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड यांनी केले.
स्थानिक नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित अमळनेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि. ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी नानासाहेब विजय पाटील ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ग्रंथालय म्हणजे ज्ञानसंपदेचा खजिना
प्रा. सुनील गरुड पुढे म्हणाले की, पुणे येथील युनिक अकादमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत दर्जेदार अशी ३० पुस्तकांची संच शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षण महर्षी नानासाहेब विजय पाटील ग्रंथालयास भेट देण्यात आला आहे. या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी अधिकाधिक वापर करावा. तसेच प्रत्येक महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ सुरू करून विद्यार्थ्यांनी अभ्यास, स्पर्धा परीक्षा व करिअर विषयक सकारात्मक चर्चांवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पुस्तकांमुळेच भवितव्य घडते – प्राचार्य डॉ. चौधरी
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पुस्तकांचा खजिनाच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपला खरा मित्र मानून वाचनाची सवय लावून घ्यावी.”
टीईटीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने टीईटी (TET) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या
प्राची दीपक पाटील, जयश्री रोहिदास पाटील, वेदांत राजेंद्र चौधरी व हरीश जगदीश पाटील
या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
प्रमुख पाहुणे: संस्थेचे प्रशासक आबासाहेब डी. बी. पाटील
विशेष आकर्षण: विद्यार्थिनी माधुरी पाटील हिने सादर केलेले देशभक्तीपर गीत
उपस्थित मान्यवर: प्रा. उषा पाटील, डॉ. नरेंद्र पाचपांडे, डॉ. नयना वाणी, डॉ. जितेश चव्हाण, डॉ. सुनंदा तायडे, प्रा. कैलास देवरे, ग्रंथपाल डॉ. विजय गाढे, विनिता पाटील, अनिकेत पाटील, किरण रावलं, विनोद पाटील, राजू पाटील, चेतन थोरात आदी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय उमेश काटे यांनी केला.
सूत्रसंचालन माधुरी पाटील हिने तर आभार प्रदर्शन नूतन पाटील हिने केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
