ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ (बापू) शेट बडगुजर यांचे निधन; अमळनेरने गमावला समाजाचा निर्भीड आरसा..

अमळनेर |आबिद शेख. अमळनेर आपल्या लेखणीने अन्यायाविरोधात निर्भयपणे प्रहार करणारे, पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनलेले ज्येष्ठ पत्रकार व *‘अटकावं न्यूज’*चे माजी संपादक जगन्नाथ शेनपडू शेट बडगुजर (बापू) (वय ७५) यांचे आज दि. २७ डिसेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ पत्रकारिताच नव्हे, तर अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बापूंनी पत्रकारितेच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजऋण फेडण्याचे कार्य आयुष्यभर केले. सत्य, निर्भयता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर त्यांनी आपली लेखणी कायम ठाम ठेवली. अन्याय, शोषण आणि विसंगतींविरोधात आवाज उठवताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
समाज पंच मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सामोपचाराने, संयमाने आणि सर्वसमावेशक भूमिकेतून सोडवले. समाजात सलोखा आणि एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि स्वप्नवत कार्य म्हणजे आर. के. नगर येथे उभारलेले भव्य चामुंडा माता मंदिर. हे मंदिर केवळ एक वास्तू नसून, बापूंनी समाजाला दिलेली एक अमूल्य सांस्कृतिक व धार्मिक देणगी आहे. श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून हे मंदिर कायम स्मरणात राहील.
ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे बापू बडगुजर यांच्या निधनाने अमळनेरच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या स्मृती, कार्य आणि मूल्ये पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
