गांधलीपुरा भागात दोन गटात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – नगरपरिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले तरी, निवडणूक निकालानंतर तणावाची एक किरकोळ घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता गांधलीपुरा परिसरात घडली. उमेदवारांच्या नातेवाईकांमधील वादातून दोन गट आमने-सामने आल्याने दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधून शबनूरबी सलीम शेख व सैय्यद मिसबाह मनाजीर अली हे उमेदवार होते. घटनेची ठिणगी सुभाष चौकातून पेटली. शबनूरबी शेख यांच्या पती सलीम टोपी यांचे नातेवाईक रफीक उर्फ रफीक मेंटल आणि मिसबाह अली (आबिद दादा) यांचे नातेवाईक अख्तर शेख मुजाहिर यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघांचे समर्थक गांधलीपुरा भागात आमने-सामने आले.
वाद वाढताच काही व्यक्तींमध्ये दगडफेक झाली. त्यात एकजण किरकोळ जखमी झाला. सुदैवाने मोठी हानी टळली.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज तसेच आरसीपी प्लाटून तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हालचाल गतीने करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.
पोलिसांच्या वेळीच घेतलेल्या कारवाईमुळे तणाव शमला असून परिसरात सध्या परिस्थिती स्थिर आहे.
