“डॉ. बी. एस. पाटील यांच्या सेवेला अंत नाही” — सहस्रचंद्र दर्शन सेवा स्फूर्ती सोहळ्यात गौरवोद्गार..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर राजकारण, अध्यात्म आणि सामाजिक सेवेला एकत्र आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार B. S. पाटील. गरजू रुग्णांची मोफत सेवा, शेतकऱ्यांप्रती बांधिलकी आणि समाजहिताचा दृढ संकल्प या त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अमळनेर येथे ‘सहस्रचंद्र दर्शन सेवा पूर्ती नव्हे, स्फूर्ती सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हटले की, “डॉ. बी. एस. पाटील यांच्या सेवेला अंत नाही. निम्न तापी पाडळसरे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना भाकरीत त्यांचा चेहरा दिसेल.”
८१ वर्षांचे व्रत – सेवा आणि साधना
सलग १५ वर्षे आमदार राहिल्यानंतर डॉ. पाटील यांनी राजकारणातून अध्यात्माकडे वळत विपश्यना केंद्राची स्थापना केली. ते हृदयरोग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत असून अनेक गरजू रुग्णांची मोफत सेवा त्यांनी केली आहे. त्यांना ही सेवा करण्याची संधी देणाऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी हा आगळावेगळा स्फूर्ती सोहळा आयोजित केला होता.
पुतळा अनावरण व सहकाऱ्यांचा सन्मान
या प्रसंगी आश्रम शाळेत त्यांच्या भाऊ प्रज्ञावंत एस. एस. पाटील आणि सासरे अण्णासो हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. स्वतःचा सत्कार न स्वीकारता त्यांनी आयुष्यात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. यामध्ये डॉ. एस. आर. पाटील, डॉ. गुलाबराव मराठे, डॉ. बाळकृष्ण देसले, डॉ. बी. आर. बाविस्कर, पी. व्ही. पाटील, सरजु गोकलाणी, प्रदीप भदाणे आणि प्राचार्य अजित वाघ यांचा समावेश होता.
पुतळा अनावरणानंतर डॉ. पाटील यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित व्हिडिओ सादर करण्यात आला.
मान्यवरांचे गौरवोद्गार
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी डॉ. पाटील यांच्या शांत, संयमी स्वभावाचे कौतुक करत सांगितले की, “त्यांच्यामुळेच पाडळसरे धरण प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.”
डॉ. प्रकाश पाठक यांनी डॉ. पाटील यांना “कर्तव्यनिष्ठ, कृतज्ञ, स्थितप्रज्ञ आणि कार्यमग्न सत्पुरुष” असे संबोधले.
डॉ. दिलीप पाटील व प्राचार्य डॉ. अजित वाघ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
‘डॉ. बी. एस. आबा – एक पंचामृत’ पुस्तक प्रकाशन
या सोहळ्यात डॉ. पाटील यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बी. एस. आबा एक पंचामृत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, “हा कार्यक्रम माझ्या सत्कारासाठी नव्हता; तर माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचे आणि ज्यांची मला सेवा करण्याची संधी मिळाली त्या रुग्णांचे ऋण फेडण्यासाठी हा सोहळा आयोजित केला होता.”
सुत्रसंचालन व समारोप
कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी हा सोहळा शिस्तबद्ध, भावनाप्रधान आणि वैचारिक मेजवानी असल्याचे मत व्यक्त केले. राजकीय व्यक्ती उपस्थित असूनही राजकारणाचा गंधही जाणवला नाही, ही या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्य होती.
डॉ. पाटील यांचे सुपुत्र डॉ. निनाद पाटील यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. संजय पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
— अमळनेरकर नागरिकांकडून कृतज्ञतेचा वर्षाव
डॉ. बी. एस. पाटील यांचे सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अमळनेरकरांच्या स्मरणात कायम राहील, असा भावनिक सूर या सोहळ्यादरम्यान उमटला.

