“वफ्क कायदा (उम्मीद २०२५) रद्द करा”; अमळनेरमध्ये मुस्लिम आणि इतर समाजांचा एकत्रित आंदोलनातून आवाज..
आबिद शेख/अमळनेर
वफ्क कायदा (उम्मीद २०२५) रद्द करण्याची मागणी करत आज अमळनेर शहरात मुस्लिम आणि इतर धर्मीय समाजांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड, महाराष्ट्र कुल जमाती तंजीम विकाफ आणि जलगाव जिल्हा एकता संघटन यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक निवेदन पाठवण्यात आले असून, केंद्र सरकारने हा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात योग्य चर्चेशिवाय आणि संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशी दुर्लक्षित करून संमत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा कायदा लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या कायद्याविरोधात सध्या सुप्रीम कोर्टात १५ याचिका दाखल असून, देशभरात ९७ लाखांहून अधिक नागरिक आणि अनेक सामाजिक संस्थांनी याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हे निवेदन अमळनेर शहर मुस्लिम समाज इदगाह ट्रस्टमार्फत मा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यात आले.
