आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य.
अमळनेर/ आबिद शेख 
मुराज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी गुरुवार, २० ऑगस्टपासून सुरू होत आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.

या कालावधीत मराठीचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास किंवा बोलण्यास नकार दिल्यास बॅज तसेच परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
राज्यात रिक्षा व टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक असल्याचा नियम १९८९ पासून अस्तित्वात आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनंतर या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी शिकणार नाही किंवा बोलणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या चालकांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल. परिवहन विभागाकडून या नियमाची अंमलबजावणी करताना कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

