मुख्य नाला स्वच्छ न झाल्याने शिरूड नाका ते बसस्थानक परिसरात पावसाच्या पाण्याचा फटका मुसळधार पावसात गांधीनगर, इस्लामपुरा व टाऊनहॉल परिसरात नाल्याचे पाणी घुसून साचत असल्याची नागरिकांची तक्रार.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील शिरूड नाका ते बसस्थानक या मुख्य मार्गालगत असलेल्या नाल्याची वेळेत स्वच्छता न झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे. विशेषतः जोरदार पाऊस झाल्यानंतर नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने ते परिसरात ओसंडून वाहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गांधीनगर, इस्लामपुरा तसेच टाऊनहॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि काही ठिकाणी घरांच्या परिसरात घुसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्याही निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, मुख्य नाल्यात गाळ, कचरा व झाडाझुडपांचे प्रमाण वाढल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. परिणामी काही वेळातच पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना ये-जा करणे कठीण होत आहे.
नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने नाल्याची स्वच्छता मोहीम राबवून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात नियमित साफसफाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या भागाची तातडीने दखल घेऊन मुख्य नाल्याची स्वच्छता व पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
