वेतनातील तफावत दूर करण्यासाठी २४ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन..
अमळनेर : लिपीक संवर्गातील वेतन त्रुटी दीर्घकाळापासून प्रलंबित असून शासनाकडून वारंवार निवेदने देऊनही कोणताही समाधानकारक निर्णय घेतला जात नसल्याने अखेर अधिकारी व कर्मचारी संघटनेने असहकार व बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य संघटनेच्या निर्देशानुसार दि. २४ फेब्रुवारी २०२६ पासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संघटनेने यापूर्वी वेतन त्रुटी संदर्भातील मागण्यांसाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदने सादर केली असून मुंबई व नागपूर येथे आंदोलनेही केली होती. मात्र, लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन निर्धारणातील गंभीर त्रुटींवर अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून प्रशासनाची ही निष्क्रियता अत्यंत खेदजनक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१) चौथ्या वेतन आयोगापासून लिपीक संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यात याव्यात.
२) लिपीक संवर्गातील पदांची संख्या कमी न करता पदोन्नतीचे स्तर कमी करण्यात यावेत.
३) लिपीक संवर्गातील पदांचे नामकरण विकास अधिकारी व प्रशासन अधिकारी असे करण्यात यावे.
४) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
५) अनुसूचित जाती, जमाती, इमाव, व्हीजेएनटी, एनटी यांना पदोन्नतीतील आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करण्यात यावे.
६) सरळ सेवेमधील मागासवर्गीय आरक्षणाची पदे तत्काळ भरावीत.
संघटनेचे सचिव दिपक पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील व अध्यक्ष मानव पाटील यांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
— अधिकारी व कर्मचारी संघटना
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय शाखा, अमळनेर जि. जळगाव
