अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया! शहर विकास आघाडीचा “भयमुक्त अमळनेर” नारा जोरदार..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :संत सखाराम महाराज आणि साने गुरुजी यांच्या संस्कारांचा वारसा लाभलेल्या अमळनेर शहराला पुन्हा एकदा सांस्कृतिक वैभवाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि गुंडगिरीला पूर्णविराम देण्यासाठी शहर विकास आघाडी पुढे सरसावली आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने शहरात गुंडगिरीचे सत्र सुरू केले होते. व्यापारी, छोटे व्यावसायिक तसेच निरपराध नागरिकांना त्रास देणे, धमकावणे, अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे असे प्रकार त्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत होते. परंतु २०१९ मध्ये अमळनेरकरांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठामपणे नाकारत शहरातून हद्दपार केले.
आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शाश्वत विकासाच्या वाटचालीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, नंदुरबारहून आलेल्या तथाकथित ‘पार्सल’ ला पुन्हा एकदा लोकांनी नाकारून अमळनेरची अस्मिता जपली असल्याचे आघाडीने सांगितले.
खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहराला विकासाच्या नवीन उच्चांकावर नेण्याचा संकल्प शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि सर्व ३६ उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
अवैध दारू, सट्टा, गुंडगिरी आणि धमकावणीचे प्रकार २०१९ नंतर मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आले. येत्या काळात गुन्हेगारीचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी आणि प्रतिबंध आणखी कडक करण्यासाठी सत्ता सक्षम हातात देणे आवश्यक असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे. त्यासाठी ‘शिट्टी’ चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर हे एक मोठे कुटुंब असून त्या कुटुंबाची सुरक्षा आणि प्रगती योग्य नेतृत्वावर अवलंबून आहे, असे स्पष्ट करत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की— केंद्रात खासदार स्मिता वाघ, राज्यात आमदार अनिल पाटील सत्तेत असून माजी आमदार साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने नगराध्यक्ष पदावर आपल्या हक्काची व्यक्ती आल्यास अधिक निधी प्राप्त करून सर्वांगीण विकास साधता येईल.
शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा कायम ठेवण्यासाठी, भविष्यातील पिढीला व्यसन आणि अवैध व्यवसायांपासून दूर ठेवण्यासाठी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करत शहर विकास आघाडीस मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
