आदिवासींचे हजारो क्विंटल धान्य लंपास..
कारवाई कधी करणार जयंत पाटलांचा सवाल..
24 प्राईम न्यूज 11 Dec 2023

आदिवासी विकास प्रकल्पातील हजारो क्विंटल धान्य लंपास करून जो कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, त्यावर सत्ताधारी कधी कारवाई करणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांवर अळीमिळी गुपचिळीची भूमिकाच घेतली जाते. आदिवासी समाजाच्या हक्काचे धान्य इतक्या मोठ्या प्रमाणात गायब होते आणि हे कोणाच्याच लक्षात आले नाही? ही अतिशय गंभीर बाब आहे.
सरकार व आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपविभागात हजारो क्विंटल धान्य आणि बारदान खरेदीच्या खोट्या व बोगस हुंड्या करून १ कोटी ६० लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ गुन्हे दाखल करू नका, तातडीने कारवाई करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या किमान आधारभूत योजने अंतर्गत शहापूरच्या साकडबाव केंद्रामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली. भरडईसाठी त्यातील जवळपास साडेआठ हजार क्विंटल भात नेण्यात आला. त्यानंतर मात्र उर्वरित सुमारे सव्वापाच क्विंटल भात आढळला नाही. त्याचा तपास घेतला असताना जवळपास १ कोटी ६० लाख रुपये किमतीचा घोटाळा झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अजित पवार गटाचे शहापूरमधील आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आणि साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा यांच्यासह अन्य ५ जणांवर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीश दरोडा यांनी आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवल्याचा आरोप आहे.
