साने गुरुजी बालवाडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष; बालगोपालांनी फोडली दहीहंडी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : येथील साने गुरुजी बालवाडी विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला.

ज्येष्ठ पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बालचिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्तिगीते तसेच विविध नृत्यांचे मनमोहक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. जन्माष्टमीनिमित्त शाळा परिसराची आकर्षक फुलांची व रंगसजावट करण्यात आली होती. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यानंतर श्रीकृष्ण व त्याच्या सवंगड्यांनी मानवी मनोरा रचत उत्साहात दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी जल्लोष केला. कृष्णभक्तीच्या गीतांमध्ये तल्लीन होत पालक व शिक्षकांनीही राधा-कृष्णाच्या रासलीलेत सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव घोरपडे सर, सहसचिव ॲड. बाविस्कर सर, सर्व संचालक मंडळ, बालवाडीच्या मुख्याध्यापिका शिंगाणे मॅडम, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला आनंदोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. बालगोपालांच्या निरागस अभिनय, नृत्य आणि उत्साहाने जन्माष्टमीचा सोहळा संस्मरणीय ठरला.

