स्वामिनी प्रकल्पाच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाचा समारोप; ३० महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या १६ दिवसीय ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

समारंभाच्या प्रमुख पाहुण्या जयश्री अनिल पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर आर्थिक स्वावलंबन मिळवत आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले. या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना ब्लाऊज, ड्रेस व इतर वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कचे कौशल्य आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.
प्रशिक्षणामध्ये ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बेसिक ते ॲडव्हान्स स्तरावरील विविध प्रकारचे आरी वर्क, आधुनिक डिझाइन्स तसेच व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे सखोल प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्री अनिल पाटील, कांचन शहा, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होत्या.
डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. जयश्री अनिल पाटील यांनी अशा कौशल्यविकास प्रशिक्षणांमुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी सहभागी महिलांना बेसिक ते ॲडव्हान्स आरी वर्कचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांनी तयार केलेल्या आकर्षक आरी वर्कच्या नमुन्यांची पाहणी करून त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जिता शिसोदे तसेच संस्थेचे कार्यकर्ते भावेश मराठे यांनी विशेष सहकार्य केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे असे कौशल्यविकास उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविणारे ठरत असून, भविष्यातही अशा प्रशिक्षणांद्वारे अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
