महाराणा प्रताप चौकात भटक्या जनावरांचा वाढता वावर; वाहतुकीला अडथळा, नागरिकांत संताप.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात भटक्या जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यात जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची गर्दी असताना रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा वाहनचालकांना जनावरांना चुकवत वाहन चालवावे लागत असल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या समस्येकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भटक्या जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
