“पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका : असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र शब्दांत हल्ला”

24 प्राईम न्यूज 18 May 2025
– एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी पाकिस्तानविरुद्ध तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगताना, त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा प्रायोजक ठरवले. भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर हे अधोरेखित करणे गरजेचे आहे, असे ओवैसी म्हणाले.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना ओवैसी म्हणाले, “मुहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून कंधार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी, आणि अलीकडील पहलगाममधील पर्यटक हत्याकांड यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि आयसिस भारतात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही.”
ओवैसी यांची केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात निवड झाली असून, हे शिष्टमंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची दहशतवादविरोधी भूमिका मांडणार आहे. यासंदर्भात ते म्हणाले, “ही जबाबदारी मी देशाच्या हितासाठी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पाकिस्तानचा ‘इस्लामिक राष्ट्र’ असा दावा हास्यास्पद असून, भारतात २० कोटी मुस्लिम शांततेत राहतात हे जगाला सांगणे गरजेचे आहे.”
सोफिया देशाची कन्या
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही ओवैसींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कर्नल सोफिया या देशाच्या कन्या आहेत. अशा प्रकारची विधाने धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी आहेत. भाजपने अशा मंत्र्यांना त्वरित बडतर्फ करून तुरुंगात पाठवावे,” असे ते म्हणाले.
