अंतुर्ली-रंजाणे परिसरात बिबट्याची चर्चा; पायांचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे परिसरात बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्याच्या पायांच्या बोटांचे ठसे आढळून आल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


दरम्यान, परिसरातील एका शेतकऱ्याच्या दोन बैलांचा फडशे पाडल्याचे निदर्शनास आल्याने बिबट्याच्या वावराच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. मात्र, बैलांचा नेमका कोणत्या प्राण्याने पाडला, याबाबत वन विभागाकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.


वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आढळून आलेल्या पायांच्या ठशांची पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली. परिसरात बिबट्याचा प्रत्यक्ष वावर आहे का, याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
अंतुर्ली-रंजाणे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीच्या कामासाठी शेतात जात असल्याने बिबट्याच्या संभाव्य वावरामुळे त्यांच्यात चिंता वाढली आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा शोध घ्यावा तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed