शाह आलम नगरातील काही भागात नळाला पाणी नाही; नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील शाह आलम नगर परिसरातील काही भागात पाणीपुरवठ्याच्या दिवशीही नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साई किराणा (राकेश किराणा) जवळील गल्लीतही पाणीपुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पाणीपुरवठा नियमित होण्याच्या अपेक्षेने नागरिक नळाला पाणी येण्याची वाट पाहत असतात; मात्र संबंधित भागात पाणीच येत नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. या समस्येमुळे विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहेत.

या भागातील नळांना पाणी का येत नाही, याची नगर परिषद प्रशासनाने तातडीने पाहणी करून समस्या शोधावी आणि नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

